breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवार पंतप्रधान कधी होणार?; चंद्रकांत पाटलांच्या प्रश्नाला राऊतांनी दिलं उत्तर; “तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना…”

मुंबई |

देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपैकी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या तीन राज्यांत राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुका लढवणार असल्याचं ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केलं आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच गोव्यातही भाजपाच्या विरोधात वातावरण असल्याचे त्यांनी सांगितलं असून उत्तर प्रदेशात सत्ता परिवर्तन होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पवारांच्या दाव्याचं समर्थन केलं आहे. यावरुन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका करत टोला लगावला आहे.

  • चंद्रकांत पाटील काय म्हणाले –

“ज्योतिष, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत लगावला आहे.

“या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष अवगत असेल तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील? याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी,” असंही ते म्हणाले.

  • संजय राऊतांचं उत्तर –

“त्यांना योग्य वेळी माहिती देऊ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम उत्तम सुरू आहे. येत्या १३ तारखेला पंतप्रधानांसोबत होणाऱ्या बैठकीत ते सहभागी होतील. शरद पवार यांच्याइतकी राजकारणाची, समाजकारणाची आणि व्यक्तिमत्वाची उंची आधी गाठा. तुमच्यासारखी जी टेकाडं आहेत त्यांना सह्याद्री किंवा हिमालयाच्या उंचीशी स्पर्धा करता येणार नाही,” असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं.

“पंतप्रधान पदावर एखादा माणूस बसला म्हणून तो मोठा होत नाही. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, लालबहादूर शास्त्री यांची उंची मोठीच होती. अनेकदा अनेक व्यक्ती त्या पदावर पोहोचू शकल्या नाहीत तरी त्यांची उंची कमी होत नाही,” अशा शब्दांत संजय राऊतांनी सुनावलं.

  • फडणवीसांना जाहीर आव्हान

महाराष्ट्रात ज्याप्रकारे तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, ती आम्ही गोव्यात होऊ देणार नाही असं राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच शिवसेनेने आपलं डिपॉझिट जप्त होऊ नये याकडे लक्ष द्यावं असा टोलाही त्यांनी लगावला आहे. संजय राऊत यांनी फडणवीसांच्या टीकेलाही उत्तर दिलं. “देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रमधून तिकडे गेले आहेत, ते गेल्यावर भाजपा तिथे फुटला. काल एक मंत्री मायकल लोबो यांनी पक्षाचा त्याग केला. भाजपाचे आमदारही पक्ष सोडून गेले. तेव्हा त्यांनी आधी पक्षांतर्गत युद्ध सुरू आहे ते बघावे,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

दरम्यान फडणवीसांनी नोटासंबंधी केलेल्या टीकेबाबत विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “गोव्यात आमची खरी लढाई नोटांशीच आहे. भाजपाचे लोक गोव्यात नोटांचा पाऊस पाडत आहेत, विशेषत: महाराष्ट्रातून बॅगा जात आहेत. त्यामुळे शिवसेनेसारखा पक्ष गोव्यात त्या नोटांशी नक्की लढेल आणि जनतेला दबावाखाली येऊ नका असं सांगण्याचा प्रयत्न करेल. शिवसेना हा सर्वसामान्यांचा, बहुजनांना, हिंदुत्ववादी पक्ष आहे. शिवसेना भाजपाच्या नोटांना पुरून उरेल हे नक्की आहे. फडणवीसांना माझा शब्द आहे तुम्ही कितीही नोटा टाका आम्ही नोटांशी लढू”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button