हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?; आशिष शेलार यांचा सवाल
मुंबई | हिंदू सणांना परवानगी देण्याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो?, असा खरमरीत सवाल भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. हिंदू नववर्षच्या निमित्ताने गुढीपाडव्याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकांना परवानगी द्या, अशी मागणी भाजपा नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्यावर सरकारनं अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे संतापलेल्या शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
मुंबईत ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. ठाकरे सरकारने गुढीपाडव्या शोभायात्रा आणि रामनवमीच्या मिरवणुकांना परवानगी देण्याची स्पष्ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्या ज्या वेळी हिंदू सणंचा विषय येतो, त्यावेळी ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल त्यांनी केला. मुंबई पोलिसांनी मुंबईत १० मार्च ते ८ एप्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. आतंकवादी, देशविरोधी शक्ती या ड्रोन, रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्ला करतील असं कारण त्यासाठी देण्यात आले आहे. पोलिसांकडे तशी माहिती आली असेल तर त्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरूर घ्यावी. मात्र, या काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम आहेत, याचाही विचार राज्य सरकारने करायला हवा,’ असं शेलार यांनी म्हटलं आहे.
‘हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्तांचा विषय आला की शिवसेनेची भूमिका बोटचेपी का असते? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. ‘कायदेशीर प्रक्रियेचं संपूर्ण पालन करून या दोन्ही सणांना परवानग्या देण्यात याव्यात. या कार्यक्रमात सरकारनं खोडा टाकू नये. आम्ही या मंडळ व समित्यांसोबत चर्चा करीत असून या उत्सवात भारतीय जनता पक्ष सहभागी होईल, असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे.