‘निवडणुका आल्या की माणसं सरड्याप्रमाणे रंग बदलतात; नितीन राऊत यांची राज ठाकरेंना टीका
पुणे |महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील भाषणात, ‘जर मशिदींच्या बाहेरील भोंगे काढले नाहीत, तर दुप्पट आवाजाने मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवा’, असे म्हटले होते. ठाकरे यांच्या भाषणानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या भाषणाची प्रशंसा केली, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मात्र त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनीही टिका केली आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हा तेव्हा अशा प्रकारची वक्तव्ये केली जातात. एखादा सरडा जसा रंग बदलतो तसेच माणसं रंग बदलत आहेत. त्याचाच हा प्रकार आहे, अशी टीका ऊर्जा मंत्री राऊत यांनी केली आहे.
पुण्यात पर्यायी इंधन क्षेत्रातील उद्योजक व गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानावर माझा विश्वास आहे. भारत देश हा विविध जाती, विविध भाषा असणारा देश आहे. देश एकसंघ ठेवण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. कुठल्याही समाजाबद्दल बोलणे चुकीचे आहे. जातीयवाद करायची गरज नाही, असेही राऊत म्हणाले.
पुण्यामधील हा पर्यायी इंधन परिषद उमेदीचा उपक्रम आहे.आम्ही हायड्रोजनवर काम करतो आहोत. या क्षेत्रात आता महाराष्ट्र उतरणार आहे. या संदर्भात सर्व कंपन्यांशी आम्ही चार्जिंग स्टेशनवर चर्चा करतो आहोत. ८५ पैसे दुचाकी आणि १ रुपयात चार चाकी इलेक्ट्रिक वर धावू शकते. यासाठी कमी खर्चात चार्जिंग स्टेशन उभारण्याचा आमचा विचार आहे, अशी माहितीही राऊत यांनी दिली आहे.