केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला?; नारायण राणेंनी पुन्हा साधला निशाणा
मुंबई |
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. वादग्रस्त विधानामुळे झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी यात्रेचा पुनश्च शुभारंभ केला आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला त्यांनी रत्नागिरीत सुरुवात केली आहे. “त्या वेळेला मी तिथे असतो तर आवाज माझाच असता..असतो तर ना..जसं एका दरोडेखोराला अटक करतात, तसं केंद्रीय मंत्र्याला अटक करायला दोनशे अडीचशे पोलीस, वा काय पराक्रम आहे? महाराष्ट्रातील जनता अनेक समस्यांनी त्रस्त आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या आजही त्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. पूरस्थिती घ्या, चिपळूण घ्या महाड घ्या, अजून कुणालाही पैसे मिळालेले नाही.”, असं टीकास्त्र नारायण राणे यांनी सोडलं.
“नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळालं. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? जया जाधवाची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे.” अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. “आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं? काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका. तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार.” असा इशारा त्यांनी दिला. “आमच्या घरासमोर वरुण देसाई कोणतरी येतो. आमच्या घरावर हल्ला करतो. त्याला अटक नाही. एवढा पोलीस बंदोबस्त असून पोरांनी चोपलं. आता परत आला तर परत जाणार नाहीत. आमच्या घरावर कुणी येईल आम्ही नाही सोडणार.” असा इशाराही त्यांनी दिला.
नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती. या यात्रेचा समारोप सिंधुदुर्गमध्ये होणार आहे. रायगडमध्ये नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने शिवसेना-भाजपा आमने-सामने आले आणि राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. नारायण राणेंचा अटकपूर्वी जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर त्यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक करून, महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या ठिकाणी सुनावणीवेळी त्यांच्या जामीनासाठी राणेंच्या वकीलाकडून जोरदार युक्तीवाद करण्याता आला. तर, पोलिसांकडून सात दिवसांसाठी पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या सुनावणीत नारायण राणेंना जामीन मंजूर करण्यात आला होता.