शिवसेनंचं हिंदुत्व, राम मंदिर निर्मिती ते मुंबई महापालिका, राज ठाकरेंवर शिवसेना नेते आदित्य ठाकरे काय म्हणाले?
अयोध्या: महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्येच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज अयोध्येच रामलल्लांचं दर्शन घेतलं. यावेळी आदित्य ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माण, उत्तर प्रदेशात महाराष्ट्र सदन होण्याची इच्छा, शिवसेनेचं हिंदुत्व, मुंबई महापालिका निवडणूक ते राज ठाकरे या सर्व विषयांवर भाष्य केलं.
त्यांच्यासोबत शिवसेना खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, युवासेना नेते वरुण सरदेसाई, दीपाली सय्यद उपस्थित होत्या. राम मंदिर निर्माण होतंय हे पाहून शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे. रामराज्य आणण्यासाठी रामलल्लांचं दर्शन घेतलंय, असं यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेनेचं राजकारण सरळ, आमचं हिंदुत्व स्वच्छ – आदित्य ठाकरे
“शिवसेनेचं राजकारण सरळ आहे, आमचं हिंदुत्व स्वच्छ आहे. रघुकूल रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन ना जाये, निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं आम्ही पाळतो”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा हिंदुत्वावर भाष्य केलं.
रामलल्लांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल
“जिंकलो हरलो तरी आम्ही वचन पाळतो. पण रामलल्लांच्या आशीर्वादाने मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल”, असा आशावादही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी उद्धव ठाकरे योगींशी संवाद साधणार
उद्धव ठाकरे हे योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करुन अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी परवानगी मागणार आहेत. महाराष्ट्रातून अयोध्येत येणाऱ्या भाविकांसाठी १०० खोल्यांचं सदन उभारण्यासाठी परवानगी मागणार आहोत, असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. अयोध्या हा आमच्यासाठी श्रद्धेचा विषय आहे. आमच्या हातातून देशाची सेवा व्हावी,अशी भावना आहे.
आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंसंदर्भातील प्रश्नावर उत्तर देणं टाळलं
अयोध्येत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या मुद्यावरुन भाजप खासदार बृजभूषण सिंग यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा त्यांना रद्द करावा लागला होता. मात्र, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला कुणीही विरोध केला नाही. तर त्यांचं स्वागत झालं. यावर प्रश्न विचारला असता, “इतरांबाबत त्यांची कशी भूमिका आहे याबाबत मी काही बोलणार नाही. त्यांनी आमचं स्वागत केलं. करोनाच्या काळात महाराष्ट्राने सर्वांना समान वागणूक आणि प्राधान्य दिलं, इथे कोण कोणाचं स्वागत करतंय कोण विरोध करतंय यापेक्षा मंदिर निर्माण चांगलं व्हावं आणि त्यासाठी इथे महाराष्ट्र सदन व्हावं अशी आमची इच्छा आहे”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंच्या प्रश्नावर बोलणं टाळलं.