हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे; खासदार संजय राऊतांचे ‘शिंदे’ गटाला ओपन चॅलेंज
मुंबईः ‘फक्त कायदेशीर मार्ग नाही, सर्व प्रकारचे मार्ग अवलंबवणार. मी तुम्हाला यशवंतराव चव्हाण यांच्या साक्षीने आणि बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीला वंदन करुन सांगतो. हम हार नही मानेंगे, आता आमची वेळ आहे,’ अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला ऑपन चॅलेंज दिलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, शिवसेना नेते अनिल देसाई आणि संजय राऊत यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात घडणाऱ्या पुढील घडामोडींबाबत चर्चा करण्यात आली तसंच, शिंदे गटाला रोखण्यासाठी पुढील रणनितीबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना राऊतांनी शिंदे गटाला थेट आव्हान दिलं आहे. तसंच, त्यांना दिलेली वेळ संपली आहे, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘लढाई रस्त्यावर झाली तरीही आम्हीच जिंकू. ज्यांना आमचा सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावं. त्यांना परत येण्याची संधी दिली होती. पण आता वेळ निघून गेली आहे,’ असं संजय राऊतांनी म्हटलं आहे. आम्हाला हार मान्य नाही. आम्हीच जिंकणार असल्याचा निर्धार राऊत यांनी केला आहे. हाऊसमध्ये देखील आम्ही जिंकू असेही राऊत यावेळी म्हणाले. ‘त्यांनी अत्यंत चुकीचा निर्णय घेतला आहे. त्यांना आम्ही संधी दिली होती. मात्र, वेळ निघून गेला आहे. त्यामुळं आम्ही आता लढायला तयार असल्याचे राऊत म्हणाले. याच इमारतीमधून महाविकास आघाडीची घोषणा झाली. याच इमारतीत महायुतीचं बंधन बांधण्यात आलं. याच इमारतीमधून मी सांगत आहे की, महाविकास आघाडी मजबूत आहे. हे सरकार पुढील अडीच वर्ष पूर्ण करेल आणि पुन्हा सत्तेत येईल,’ असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला आहे. आम्हाला जे करायचे ते आम्ही आता केलं आहे. शरद पवार हे देशाच्या राजकारणातील सगळ्यात मोठे नेते आहेत. त्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा संवाद सुरु असल्याचंही राऊतांनी सांगितलं.