मेट्रोच्या पुलाला आमचा विरोध नव्हताच, अखेर पुण्यातील गणेश मंडळांनी मांडली भूमिका
पुणे | मागील तीन महिन्यांपासून पुणे शहरातील लकडी पुलावरील मेट्रोचे काम बंद आहे. विसर्जन मिरवणुकीत देखाव्यांना अडथळा ठरणार असल्याचे कारण देऊन गणेश मंडळांनी या पुलाला विरोध केल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून हे काम ठप्प होते. त्यानंतर आता प्रथमच पुण्यातील मानाच्या पाच गणपतीसह प्रमुख गणेशोत्सव मंडळांनी याप्रकरणी आपली भूमिका जाहीर केली.मेट्रोच्या कामाला आमचा कधीच विरोध नव्हता असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे आता हा वाद नेमका कोणी सुरू केला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.मंगळवारी झालेल्या पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयावरून मोठा वाद झाला होता. त्यानंतर आता गणेशोत्सव मंडळांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे.. गणेश मंडळांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सध्या संभाजी पुलावरील मेट्रो पुलाच्या उंची बाबत वाद सुरू आहे.
त्या अनुषंगाने पुण्यनगरी चा अष्टविनायक मंडळांना खुलासा करणे आवश्यक वाटते. गेल्या चार वर्षापासून मेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रो मुळे पुण्याच्या विकासात भर पडणार आहे. परंतु मेट्रोची मार्गिका गणपती विसर्जन मार्गावरून जात असताना हे काम सुरू झाले त्यावेळी संभाजी पुलावरील उंचीचा मुद्द कोणाच्याही लक्षात आला नाही किंवा कोणी निदर्शनास आणून दिला नाही.
संभाजी पुलावरील मेट्रोच्या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस अडथळा निर्माण होईल म्हणून काम बंद करण्याचे निवेदन गणेश मंडळांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना दिले होते. यावर मेट्रो प्रशासनाने मागील चार महिने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. परंतु तज्ञ समितीने सुचविलेले पर्याय अव्यवहार्य असल्याने महापौरांनी काम सुरू करण्यास सांगितले असे या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान पुण्याच्या गणेशोत्सवाला एकशे पंचवीस वर्षाहून अधिक वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळ आतील कार्यकर्ते हे जबाबदार पुणेकर आहेत. गणेशोत्सवात समाजप्रबोधन समाजहिताला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे संभाजी पुलावरील मेट्रो फुलाच्या उंचीबाबत आमचा कधीही विरोध नव्हता. गणेशोत्सव मंडळाने वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य केले आहे त्यामुळे कार्यकर्त्याची भूमिका ही नेहमीच सकारात्मक राहिलेली आहे असे या निवेदनात नमूद केले आहे.