मुंबईकरांवरील पाणीकपात टळली; ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा
मुंबई | यंदा कडक उन्हाळा जाणवत असला तरी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे यंदा मुंबईकरांवरील पाणीकपातीचे संकट टळले आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांना ७ जलाशयांमधून पाणी पुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. यंदा पावसाळ्यात पडलेला समाधानकारक पाऊस आणि अवकाळी पावसामुळे धरणातील पाणीसाठा वाढला होता. त्यामुळे या धरणांमध्ये सध्या ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा हा जलसाठा आहे. मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तुळशी, विहार आणि भातसा या जलाशयांमधून शहराला दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र या धरणांत चांगला पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे यंदा मुंबईत पाणीकपात करावी लागणार नाही, असे मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.