कोकणासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई- राज्यात सोमवारपासून पावसाने पुन्हा एकदा कमबॅक केले. त्यामुळे मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने एक-दोन दिवस उसंत घेतली. आता पुन्हा येत्या चार ते पाच दिवसांत कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उद्या 5 सप्टेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच 6 सप्टेंबरला कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, तर मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर 7 सप्टेंबरला नाशिक, औरंगाबाद, पालघरसह ठाणे, जालना, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात, तर 8 सप्टेंबरला पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.