VIDEO: …म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांसाठी अचानक थांबवला ताफा
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. यावेळी चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे पुढील कार्यक्रमासाठी निघाले असता रस्त्याच्या बाजूला शेतकरी आणि प्रकल्पग्रस्त थांबलेले पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि संवाद साधला.
सकाळी ठाकरे यांनी गोसीखुर्द धरणाची पाहणी केली होती. त्यानंतर चंद्रपूरमधील घोडाझरी कालव्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावेळी स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गेली 35 वर्षे शेतीला पाणी मिळत नसल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांनी केली, हजारो कोटी रुपये खर्चून शेती तहानलेली असल्याची खंत शेतकऱ्यांनी मांडली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी निवेदन स्वीकारत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
तसेच घोडाझरी शाखा कालव्याच्या कामाची पाहणी त्यांनी केली. घोडाझरी शाखा कालवा हा गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाचा घटक आहे. गोसीखुर्द उजव्या कालव्याच्या 36.76 किमी वरून घोडाझरी शाखा कालवा उगमीत असून एकूण लांबी 55 किमी आहे. घोडाझरी शाखा कालव्याच्या लाभ क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण 5 तालुके (ब्रह्मपुरी, नागभीड सिंदेवाही, मुल व सावली ) येतात. यातील 19 गावात 2906 हेक्टर सिंचन क्षमता निर्मिती होणार आहे. गोसीखुर्द प्रकल्प यापुढे न रखडता सर्व घटकांच्या सहकार्याने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण झाला पाहिजे. यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे नियोजन करावे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण करून विदर्भातील जनतेस सिंचनासाठी मोठा लाभ मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.