विदर्भ व मराठवाड्याला एक पैसाही कमी पडू देणार नाही: उपमुख्यमंत्री
मुंबई – महाराष्ट्राच्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली असून, कोरोनामुळे झालेले अर्थव्यवस्थेचे नुकसान व त्यामुळे लघु उद्योगाला बसलेली आर्थिक झळ, तसेच महाविकास आघाडीतील मंत्री धनंजय मुंडे प्रकरण किंवा संजय राठोड यांनी दिलेला राजीनामा यामुळे सरकारची डागाळलेली प्रतिमा, अशी अनेक आव्हाने सरकारसमोर आहेत आणि याच विषयांवरून भाजपा, महाविकास आघाडीला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळं अस्तित्वात असल्याचं गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल.#विधिमंडळअर्थसंकल्पीयअधिवेशन२०२१
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) March 1, 2021
वाचा :-वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक राज्य सरकार यांच्यात कलगीतुरा
अर्थसंकल्पामध्ये मराठवाडा व विदर्भासाठी विशेष तरतूद करून अनुशेष भरून काढावा, यासाठी भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला याबाबतची भूमिका जाहीर केली होती.
त्याच मुद्द्यावरून सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे; तथापि भाजपाच्या या आरोपांना सडेतोड उत्तरे देताना अर्थमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले की विदर्भ व मराठवाड्याच्या विकासासाठी हे सरकार कटिबद्ध असून त्या प्रदेशातील विकासासाठी एक रुपयाही कमी पडू देणार नाही. दरम्यान आता हे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या दिवसांत वेगवेगळ्या मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता आहे, यावर सरकार कशापद्धतीने उत्तर देते हे बघणे महत्त्वाचे असणार आहे.