येत्या काळात देशात रोख रक्कमेची टंचाई निर्माण होणार
येत्या काळात देशात रोख रक्कमेची टंचाई निर्माण होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेकडून लिक्विडिटी अॅडजस्टमेंट फ्रेमवर्क वापरण्यात येणार असल्याचे समजते आहे. एलआयसीचा आयपीओ येणार असल्याने रोख रक्कमेची टंचाई निर्माण होऊ शकते असं म्हटलं जात आहे.अर्थसंकल्प जाहीर झाल्यापासून साऱ्यांचे एलआयसीच्या आयपीओकडे लक्ष लागून राहिले आहे. त्यात, एलआयसीचा अर्जही सेबीकडे सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आयपीओसाठी मोठ्या प्रमाणात बँकेत पैसा जमा होऊ शकतो. परिणामी ६५ ते ७० हजार कोटींची रोख रक्कम व्यवहारातून बाद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, आंतरराष्ट्रीय घडमोडींमुळे डॉलरची किंमत अस्थिर झाली आहे. त्यामुळे रोख रक्कमेचा तुडवडा जाणवू नये याकरता लिक्विडिटी अॅडजस्टमेंट फ्रेमवर्क रणनिती वापरण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या महिन्यात जीएसटी भरणा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व्यवहारातून बाद झाली होती. त्यावेळी रिझर्व्ह बँकेने कालबद्ध रेपो माेहीम राबवून रोखीच्या टंचाईचा सामना केला होता. आता एलआयसीच्या आयपीओच्या वेळीही हीच परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. याआधी पेटीएमच्या आयपीओच्या वेळी बँकांत मोठ्या प्रमाणात ठेवी वाढल्या होत्या. ५ नोव्हेंबर २०२१ ला संपलेल्या पंधरवड्यात बँक ठेवींचा आकडा अचानक वाढून ३.३ लाख कोटींवर गेला होता. त्यानंतरच्या पंधरवड्यात तो २.७ लाख कोटींवर घसरला होता. याच काळात पेटीएमचा आयपीओ आला होता. एलआयसीचा आयपीओ पेटीएमच्या आयपीओपेक्षा चारपट मोठा आहे. पेटीएमचा आयपीओ १८,३०० कोटी रुपयांचा होता.