अवकाळी पावसाने झोडले; काजू-आंब्यांच्या बागांना मोठा फटका
सिंधुदुर्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी रात्री आणि आज सकाळी जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद गारव्याचा दिलासा मिळाला. मात्र या पावसाचा मोठा फटका आंबा-काजूच्या बागांना बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
चक्रीवादळामुळे हवामानात बदल झाला आहे. त्याचा परिणाम म्हणजे महाराष्ट्राच्या काही भागांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी उकाडा वाढला आहे. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तालुक्यांमधील अनेक गावात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्याचा फटका आंबा आणि काजूच्या बागांना बसला. पावसामुळे आंब्याचा मोहोर आणि आंबे गळून पडले. काजूच्या बागांचेही असेच नुकसान झाले आहे. त्यामुळे आंबा-काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाले आहेत. आंब्याचा मौसम सुरू झाला असताना बागांचे नुकसान झाल्याने ते चिंताग्रस्त झाले आहेत.