केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केला समीर वानखेडेंच्या जातीचा उल्लेख; म्हणाले…
पुणे |
आर्यन खान प्रकरण रोज नवनवे वळण घेत आहे. आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले आहेत. तर, नवाब मलिक यांनी देखील वानखेडेंवर आरोप केले होते. या प्रकरणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. समीर वानखेडे हे मागास जातीतील अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना मंत्री नवाब मलिक यांनी लक्ष्य केले आहे, असं आठवले यांनी म्हटलंय.
रामदास आठवले म्हणाले, “समीर वानखेडे हे मागास जातीतील अधिकारी आहेत. म्हणून त्यांना नवाब मलिक यांनी लक्ष्य केले आहे. समीर वानखेडे यांनी मलिक यांच्या जावयाला अटक केली होती, त्यामुळे ते समीर वानखेडेंवर आरोप करत आहे. प्रत्यक्षात मात्र, समीर वानखेडे आपले कर्तव्य बजावत होते,” असंही ते म्हणाले. दरम्यान, अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाईल, त्यांना तुरूंगात पाठवू या राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्याचे अल्पसंख्याक कल्याणमंत्री नवाब मलिक यांच्या इशाऱ्याबाबत आठवलेंनी वानखेडेंची नोकरी की, मलिकांचे मंत्रिपद जातयं हे पाहुया, असं आठवले म्हणाले.
सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सिनेसृष्टीतील अंमली पदार्थाच्या मोठ्या प्रमाणातील सेवनाचा मुद्दा समोर आला. आर्यन खानवरील कारवाईत बिलकुल पक्षपातीपणा नसून, त्याच्या विरोधात भक्कम पुरावे असल्यानेच न्यायालय त्याला जामीन देत नसावे. सक्त वसूली संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग, अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या छापेमारीत दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई ही होणारच असल्याचे आठवले म्हणाले.