‘हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर एकतर्फी कारवाई’
अमरावती |
अल्पसंख्याक संघटनांनी अमरावतीत गेल्या १२ नोव्हेंबरला काढलेल्या मोर्चादरम्यान जो हिंसाचार झाला, त्यावर राज्य सरकार मौन बाळगून आहे. १२ नोव्हेंबरची घटना पुसून टाकून १३ तारखेच्या घटनेत जे लोक सहभागी झाले, तेवढेच पाहिले जात आहे. जे लोक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहेत त्यांनाच जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. राजकीय दबावाखाली पोलीस एकतर्फी कारवाई करीत आहेत, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केला.
अशीच कारवाई होत राहिली तर भाजपचे सगळे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा फडणवीस यांनी दिला. राज्यात निघालेले मोर्चे कोणी आखले, त्यांची भूमिका काय होती, सामाजिक सद्भाव बिघडला पाहिजे असा कोणाचा उद्देश होता का, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्रिपुरात न घडलेल्या घटनांबाबत आठ तारखेला राहुल गांधी यांनी ट्विट केले. त्यानंतर महाराष्ट्रात हे घडले, असा आरोप यावेळी त्यांनी केला. अमरावतीत झालेल्या हिंसाचारची घटना दुर्दैवी आहे असे फडणवीस यांनी नमूद केले.