भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी आपल्या एका चुकीची कबुली दिली
सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद

पुणे : सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा विरुद्ध हिंदी भाषा असा वाद सुरु आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यात हिंदी भाषा सक्तीची करण्याविरुद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. टोकाचा संघर्ष होईल असं मनसेचे मुंबई शहरध्यक्ष संदीप देशपांडे म्हणाले. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रामाणिकपणे आपल्या एका चुकीची कबुली दिली आहे. “राजकारण होत आहे, खरतर काल मी बोलताना चुकून हिंदीला राष्ट्रभाषा म्हटलं, मी त्याऐवजी राजभाषा म्हणायला हवं होत. हिंदी राजभाषा आहे. काल मी म्हटलं ती राष्ट्रभाषा आहे” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा – दोन हजार रुपयांहून अधिकच्या UPI Payment वर खरंच जीएसटी लागणार का? सरकारनं जारी केलं पत्रक
“माझ्या म्हणण्याच तात्पर्य असं होतं की, हिंदी राजभाषा आहे, यावरुन यावरुन काही लोकांनी टिकाटिप्पणी केली. या देशात विकासाच पाऊस उचललं, की ते थांबवण्याच काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतं” असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले. “मराठी अस्मिता, मराठी माणसाकरीता, मराठीच आमची भाषा असली पाहिजे” असं बावनकुळे म्हणाले.
‘देशातल्या 60 टक्के राज्यातला काराभार हिंदीत’
“राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा या देशात विचार केला, तर हिंदी विषय असेल. हिंदी विषय जर अभ्यासक्रमात आला असेल, तर त्यावरुन इतकं मोठं राजकारण करुन, आंदोलन करणं, लोकांना मारपीटण करणं हे योग्य नाही” असं बावनकुळे म्हणाले. “मराठी भाषेबद्दल कुठलीही तडजोड करणार नाही. पण प्रत्येकाला हिंदी भाषा आलीच पाहिजे. उत्तर प्रदेश किंवा देशातील अन्य भागात फिरताना काही लोक इंग्रजी, हिंदी, तामिळ भाषेत बोलतात. त्यामुळे किमान एक कॉमन भाषा, राजभाषा हिंदी साधारणपणे येत असते. देशातल्या 60 टक्के राज्यातला काराभार हिंदीत चालतो, त्या त्या राज्याची भाषा, अस्मिता टिकवून हिंदी भाषा आली पाहिजे यात काही गैर नाही” असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.