उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार- किरीट सोमम्या
रत्नागिरी – मुंबईत शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. राम मंदिराच्या जमीन खरेदीबाबत भ्रष्टाचाराच्या आरोपवरून शिवसेनेनं भाजपवर केलेल्या टीकेमुळे भाजप संतापली आहे. यावरून आता भाजप नेते किरीट सोमम्या यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. उद्धव ठाकरेंचं सरकार हे गुंड सरकार आहे, असं किरीट सोमम्या यांनी म्हटलं आहे. शिवसेनेवर आरोप करताना त्यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावरही निशाणा साधला. मातोश्रीच्या जवळचे आणि रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांनी कोरोना काळात घोटाळा केला. यावेळी त्यांनी दापोली तालुक्यातील मुरूड गावच्या समुद्र किनारी नियमांचा भंग करत रिसॉर्ट उभं केलं, असा आरोप त्यांनी केला आहे.
रिसॉर्टमध्ये देखील कोटींचा आर्थिक घोटाळा आहे. मुळात साठे या जमिन मालकाकडून अनिल परब यांनी शेत जमिन खरेदी केली. मग तिथे आठच दिवसामध्ये रिसॉर्ट कसा उभा राहिला?, असा सवाल त्यांनी विचारला आहे. यामध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना देखील शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमम्या अनिल परब यांच्यावर टीका करत आहेत. नियोजनचा पैसा हा परब यांनी उभारलेल्या रिसॉर्टमध्ये जाण्यासाठी रस्ता तयार करण्यासाठी खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं. मी याबाबत कायदेशीर लढाई लढणार असून परब यांना शिक्षा होईल, असंही ते म्हणाले.