भारतीय विमान सेवेवरील निर्बंध संयुक्त अरब अमीरातने हटवले
नवी दिल्ली – कोरोनामुळे संयुक्त अरब अमीरातने भारतीय विमान प्रवाशांवर घातलेले निर्बंध आता शिथिल केले आहेत. त्यानुसार त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना आणि ७२ तासांच्या आतील कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल असलेल्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. ५ ऑगस्टपासून भारतीय विमानांवरील निर्बंध युएईने हटवले आहेत.
दुबईमार्गे अन्य देशांमध्ये जाणाऱ्या विमान उड्डाणांना यूएईने निर्बंध घातले होते. याशिवाय भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाल्यामुळे भारतीयांना प्रवेश बंदी केली होती. परंतु आता ती शिथिल केली आहे. त्यात लस घेतलेल्यांना प्रवेशाची परवानगी दिली असून चाचणी अहवाल असलेल्यांनाही दुबईत प्रवेश दिला जाणार आहे. याबाबतचा निर्णय मंगळवारी एनसीईएमएने जाहीर केला. भारताबरोबरच पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, नायजेरिया आणि युगांडावरील निर्बंधही यूएईने शिथिल केले आहेत. यानुसार ५ ऑगस्टपासून विमान उड्डाणांना परवानगी दिली आहे.