हरियाणात आणखी दोन शेतकऱ्यांचा आंदोलनात मृत्यू; ८ दिवसांत तिघांचा बळी
चंदीगड – मागील ११ महिन्यांपासून हरियाणातील टिकरी सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील आणखी तीन शेतकऱ्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या शेतकरी आंदोलनात आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला असून आठ दिवसांतच तिघांचा मृत्यू झाला आहे.
या आंदोलनात जीव गमावलेल्या दोघा शेतकऱ्यांची नावे जगतार सिंग (५७) आणि करण सिंग (६०) अशी आहेत. शुक्रवारी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास नजफगड उड्डाणपूलाजवळ जगतार सिंग यांचा मृतदेह आढळला. जगतार सिंग हे जिल्ह्यातील काबर गावचे रहिवासी होते. विशेष म्हणजे याचदरम्यान टिकरी सीमेवर तंबूत करण सिंग यांचा मृत्यू झाला. ते जिंद जिल्ह्यातील किसान चौकाजवळच्या शाहपूर कंडेला गावात राहत होते. सकाळी दूध पिऊन तंबूत परतल्यानंतर ते बेशुद्ध पडले होते. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तीन दिवसांपूर्वी एका डंपरने याच ठिकाणी पाच महिलांना चिरडले होते. त्यात तिघींचा मृत्यू झाला होता, तर २८ ऑक्टोबर रोजी तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. धरम सिंग, रिपन सिंग (५५) आणि निहंग सोहन सिंग (९५) अशी त्यांची नावे आहेत. धरम सिंग व रिपन सिंग हे बठींडा येथील रहिवासी होते.