शेतात उभारलेल्या प्रक्रिया उद्योगातून लाखोंची उलाढाल
हिंगोली | नियोजन, जिद्द, चिकाटी असेल तर छोट्या व्यवसायातून सुद्धा यशस्वी उद्योजक होऊ शकतो याचे उदाहरण हिंगोली जिल्ह्यातल्या पानकनेरगाव येथील कोतेवार कुटुंबीयांकडे बघितल्यानंतर लक्षात येतं. कोतेवार कुटुंबीयांनी शेतात उभारलेल्या प्रक्रिया उद्योगातून भरारी घेतली आहे. हळद, मिरचीसह विविध मसाल्यांचे उत्पादन करत आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या बाजारपेठेत विक्री करत त्यांची वार्षिक उलाढाल सुमारे तीस लाखांवर पोहोचली आहे.
कोतेवार कुटुंबातील या तिघा भावंडांनी खांद्याला खांदा लावून हा उद्योग उभारला आहे. पैकी महादेव आणि गजानन शेती व उद्योगाची जबाबदारी पाहतात. तर माणिक पुण्याला नोकरीला आहे. दोन शिवारात मिळून या कुटुंबाकडे १५ एकर शेतजमीन आहे. पैकी पाच एकर बारमाही तर १० हंगामी बारमाही आहे. या शेतात दोन विहिरी आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अनेक गावांप्रमाणे कणेरगाव येथिल शेतकऱ्यांचे हळद पारंपरिक पीक आहे. दर वर्षी तीन ते चार एकरावर हळद पीक असते. हळदीचे वाढते उत्पादन लक्षात घेता कुटुंबीयांनी हळद पावडर निर्मितीचा निर्णय घेतला. २०११ -१२ मध्ये गावातील गिरणीच्या आधारे शेतातील हळदीपासून पावडर तयार करण्यास सुरवात केली.
गाव परिसरात महिन्याकाठी चार ते पाच होती पावडर तयार करण्यास सुरवात केली. औरंगाबाद, पुणे या ठिकाणी जाऊन आयोजित प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ मिळविण्याचा प्रयत्न सुरू झाला. मागणी पुरवठा व्यावसायिकांची मानसिकता यांचा अभ्यास होऊ लागला. यातून मोठ्या प्रमाणावर अनुभव सुद्धा मिळू लागला. व्यवसाय वाढतच बँकेकडून आर्थिक मदत सुद्धा घेऊन या छोट्या व्यवसायाचं उद्योगात रूपांतर झालं.
यंत्रसामग्री अनेक कामगारांच्या हातांना काम सुद्धा मिळू लागलं. हळदीपासून सुरू झालेला हा व्यवसाय कीचन रूममधील मसाल्यांसह लोणच्यापर्यंत पोहोचला. वर्षाला ३० लाखांच्यावर उलाढाल होऊ लागली. जे काही शक्य झालं ते मेहनत व जिद्दीच्या जोरावर, असं कोतेवार कुटुंबीय सांगतात.
करोना काळात गेल्या दोन वर्षांपासून व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. आमच्या सोबतच समूहात काम करणाऱ्या कामगारांना देखील याची झळ पोहचली. मात्र निर्बंध उठवण्यात आल्याने पुन्हा एकदा व्यवसायाला पहिल्यासारखी गती प्राप्त झाली आहे. मोठमोठ्या कंपन्या शहरात हजारो नागरिकांना काम देतात अशाच प्रकारे मला माझ्या गावात उद्योग उभारून तरुण युवा पिढीच्या हाताला काम द्यायचं आहे. मातीशी नाळ जोडून ठेवायची आहे. उद्योग, व्यवसायात जिद्द, चिकाटी आणि मेहनत ठेवली तर अपणही यशाचे शिखर गाठू शकतो.