राज्यात रुग्णसंख्येत सहा दिवसांत तिप्पट वाढ; वाढत्या संसर्गाबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता
मुंबई |
गेल्या २० दिवसांत उपचाराधीन रुग्णांमध्ये ५० टक्के वाढ झाली असून, सहा दिवसांत रुग्णसंख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती सोमवारी मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणा वेळी देण्यात आली़ राज्यातील बाधितांचे प्रमाणही वाढल्याने (१.०६ टक्के) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. यावेळी आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ़ प्रदीप व्यास यांनी करोनास्थितीबद्दल सादरीकरण केले. जानेवारीच्या मध्यावर करोनाच्या उपचाराधीन रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला ८ लाख लसमात्र देत होतो, सध्या प्रतिदिन ५ लाख मात्रा दिल्या जात असल्याची माहिती त्यांनी दिली. ८ डिसेंबर रोजी राज्यात ६ हजार २०० उपचाराधीन रुग्ण होते . त्यात वाढ होऊन उपचाराधीन रुग्णांची संख्या सोमवारी १० हजार झाली.
करोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पहावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, या संदर्भात एक दोन दिवसांत कृती दलाची बैठकही आयोजित करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
- १५ ते १८ वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिनची मात्रा
नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीनांच्या लसीकरणासाठी केवळ कोव्हॅक्सिन लशीचा उपयोग केला जाईल. त्यांचे लसीकरण ३ जानेवारीपासून करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्या अनुषंगाने आरोग्य मंत्रालयाने, मुलांसाठी कोव्हॅक्सिन लशीचाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट केले. तसेच आरोग्य कर्मचारी आणि ६० वर्षांवरील बहुव्याधीग्रस्तांना दुसऱ्या मात्रेला नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर वर्धक मात्रा (बूस्टर डोस) देण्यात येईल, केंद्राने म्हटले आहे.
- ओमायक्रॉनचे २६ नवे रुग्ण
मुंबई : राज्यात ओमायक्रॉन २६ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ११ जण मुंबई, पाच जण पनवेल तर चार जण ठाण्यातील आहेत. तसेच राज्यात दिवसभरात करोनाच्या १४२६ नव्या रुग्णांची नोंद झाली.