शिर्डीहून शनिशिंगणापूरला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; चारजण ठार
अहमदनगर: एसटीबस आणि शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या कारच्या भीषण अपघातात चारजणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे भाविक मध्यप्रदेशातून शिर्डीकडे जात होते. कारला एसटी बसची जोराची धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की यात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगरहून शिर्डीकडे येत असलेल्या एसटी बस क्रमांक Mh 14 BT 4502 आणि शिर्डीहून शिंगणापूरच्या दिशेने जात असलेल्या महिंद्रा XUV क्रमांक MP 10 CB 1236 यांची समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भिषण होती की यात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
- अपघातात चौघांचा मृत्यू
या अपघातात एक महिला आणि पुरूषाचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी असलेल्या मुलाचा आणि एका महिलेचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. राहुरी तालुक्यातील गुहा गावाजवळ दुपारी साडेतीन वाजेच्या दरम्यान हा भिषण अपघात झाला.
अहमदनगर मनमाड महामार्गाचे काम सुरू असल्याने सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे. गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची माहिती आहे. राहुरी पोलीस घटनास्थळी पोहचले असून चार जणांचे शासकिय रूग्णालयात शवविच्छेदन केले जाणार आहे. दरम्यान हे भाविक एकाच कुटुंबातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून हे सर्वजण मध्यप्रदेशातील कोणत्या गावातील आहेत याबद्दल अद्याप माहिती मिळू शकली नाही.