मुंबईत मुसळधार पाऊस; सखल भागांत साचले पाणी
मुंबई – हवामान खात्याने 9 ते 13 जूनदरम्यान मुंबई आणि परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिला होता. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. मुंबईला रात्रभर पावसाने चांगलेच झोडपले असून अद्यापही मुंबई आणि उपनगर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली असून वाहनांना पाण्यातून वाट काढणे अवघड झाले आहे, तर कामावर जाण्यासाठी निघालेल्या लोकांचेही हाल होत आहेत.
मुंबईतील पश्चिम उपनगरे म्हणजेच अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस कोसळतोय. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरू असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत. पावसामुळे सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले असून सायनच्या अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.
दरम्यान, हवामान विभागाकडून मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून 4 दिवस हे मुंबईसाठी धोक्याचे असणार आहेत. या काळात 300 मिलिमीटहून जास्त पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.