आजचा बंद शेतकऱ्यांसाठीच- छगन भुजबळ
पुणे |
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे चार शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ सोमवारी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. लखीमपूर खेरी जिल्हा मुख्यालयापासून सुमारे ७० किमी अंतरावर टिकुनिया येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी चार शेतकरी होते. दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या असल्या तरी सत्ताधारी पक्षांनीच आवाहन केल्याने बंदला प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही या बंदविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, मंत्री आणि मंत्रिपुत्र जे आहेत, ते आव्हान देतात काय? आंदोलन करणाऱ्या लोकांच्या अंगावर गाड्या घालतात काय? ह्यात फार मोठा फरक आहे. हा संप शेतकऱ्यांसाठीच आहे. देशातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही समान समजतो. ते शेतकरी ज्यासाठी आंदोलन करतायत त्यात आपल्याकडच्या शेतकऱ्यांचाही फायदाच आहे. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे शेतकऱ्यांना चिरडून मारु शकत नाही. हा एक संदेश आपल्याला यातून द्यायचा आहे.
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार समितीमधील व्यवहार राहणार बंद राहणार असून शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणू नये असं बाजार समितीच्या वतीने आवाहन करण्यात आलं आहे. बाजार समिती बंद राहणार असल्याने लाखो रुपयांचा व्यवहार ठप्प आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी मुंबईत सुरक्षा कडक करण्यात आली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक गस्त घालण्यात येणार असल्याचे पोलिसांनी रविवारी सांगितले. महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तीन कंपन्या, ५०० होमगार्ड आणि स्थानिक शस्त्र युनिटमधील ७०० जवानांसह स्ट्राइकिंग साठा देखील मोक्याच्या ठिकाणी तैनात केला जाणार आहे.