कोरोनाचे सर्व निर्बंध हटवणार; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली | देशभरात कोरोनाची लाट आता ओसरत चालली आहे. ठीक दोन वर्षांपूर्वीच आजच्या दिवशी देशभरात लॉकडाऊन सुरू झाला होता आणि अनेक निर्बंध लावण्यात आले होते. पण, आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व निर्बंध हटवले जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. फक्त मास्क आणि सहा फूट अंतर राखण्याची नियम लागू राहणार आहे.
केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. या पत्रात म्हटले आहे की, ‘गेल्या 24 महिन्यांत महामारी व्यवस्थापनासाठी विविध क्षमता विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये चाचणी, पाळत ठेवणे, संपर्क शोधणे, उपचार, लसीकरण, रुग्णालयांचा विकास यांचा समावेश आहे’. देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने महामारी रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्चपासून कोरोना निर्बंध संपणार आहेत. दोन वर्षांनंतर देशातील जनतेची या निर्बंधातून सुटका झाली. आता फक्त सहा फुटाचे अंतर राखावे लागणार असून मास्क लावावा लागणार आहे.
केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत 24 मार्च 2020 रोजी प्रथमच कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानंतर अनेक वेळा या मार्गदर्शक तत्त्वात बदल करण्यात आले. आज केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.