‘त्या’ निलंबित 12 आमदारांची सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव
मुंबई – पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत गोेंधळ माजवत तालिका अध्यक्षांना शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजपाच्या 12 आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले होते. आता या निलंबित झालेल्या भाजपाच्या 12 आमदारांनी राज्य सरकारविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय निर्णय देते हे पाहावे लागणार आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे तालिका अध्यक्ष भास्कर जाधव बोलत असताना विरोधी बाकावरील भाजपा आमदारांनी गोेंधळ घालत अध्यक्षांसमोरील राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. तसेच तालिका अध्यक्ष बोलत असलेला माईकही ओढला होता. त्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकुब झाल्यावर उपाध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्षांना आई-बहिणीवरून शिवीगाळ करण्यात आली होती. या सर्व प्रकारामुळे अखेर भाजपाच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. मात्र केलेली कारवाई ही चुकीची असून भाजपाच्या कोणत्याही आमदाराने शिवीगाळ केली नसल्याचे विरोध पक्षनेते देवेेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. या कारवाईनंतर भाजपाच्या आमदारांनी राज्यपाल कोश्यारी यांचीही राजभवन येथे भेट घेतली होती. त्यानंतर आज या निलंबित झालेल्या 12 आमदारांनी राज्य सरकारने केलेल्या कारवाईविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली आहे.लवकरच या याचिकेवर सुनावणी होणार असून सुप्रीम कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.