breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“ दाऊदशी संबंधित लोकाच्या संदर्भात या सरकारला विशेष प्रेम दिसतय” ; फडणवीसांनी साधला निशाणा

मुंबई |

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज चांगलच गाजलं. कारण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा एक पेनड्राईव्ह सभागृहात सादर करून आणि वक्फ बोर्डावरील सदस्याचे कसे दाऊशी संबंध आहेत, हे दर्शवून नवा बॉम्ब टाकला. याशिवाय, सरकारी वकील अॅड. चव्हाण प्रकरणाचा तपास राज्य सरकारने सीबीआयकडे न देता सीआयडीकडे दिल्याने विरोधी पक्ष भाजपाने सभात्यागही केला. यानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

  • जोपर्यंत ही चौकशी सीबीआयकडे जात नाही आमचा लढा सुरूच राहणार…

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ मूळातच जो पेनड्राईव्ह मी दिला. त्यामध्ये स्पष्टपणे कट दिसतोय. कशाप्रकारे गिरीश महाजनांकडे रेड करायची. त्या रेडमध्ये काय काय ठेवायचं आणि हे घडलय. जे त्या सीडीमध्ये दिसतय ते सगळं घडलय. एवढच नाही तर अनेक प्रकरण त्यामध्ये आहेत, ती सगळी घडली आहेत. प्रत्येक ठिकाणी राज्यातल्या नेत्याचं, मंत्र्यांचं नाव हे वकील घेत आहेत. अशा परिस्थितीत राज्याचे पोलीस याची चौकशी कशी करणार, त्यांच्यावर दबावच येणार आहे. म्हणून आम्ही अतिशय स्पष्टपणे ही मागणी केली होती, की हे प्रकरण सीबीआयला द्यायला पाहिजे. आज खरंतर उत्तर देताना वळसे पाटील यांच्यासारखा अनुभवी आणि मुरब्बी व्यक्ती देखील, सारखा अडखळत होता. याचं कारण त्यांना मनातून माहीत होतं की आपण जे उत्तर देतोय ते चुकीचं देतोय. जोपर्यंत ही चौकशी सीबीआयकडे जात नाही आमचा लढा सुरूच राहणार आहे. आम्ही न्यायालयात देखील जाणार आहोत. ही सगळी चौकशी सीबीआयला गेली, तर फार मोठ्या षडयंत्राचा पर्दाफाश होणार आहे.”

  • त्यांचा का राष्ट्रवादीशी संबंध आहे हे जगजाहीर आहे…

तसेच, “ यासोबतच डॉ. लांबे यांच्या संदर्भात जी क्लिप मी दिलेली आहे. मला असं वाटतं की अशाप्रकारे या सरकारमध्ये ज्या लोकाची दाऊदसोबत जवळीक दाखवली जाते, अशा लोकाना प्राधान्य आहे आणि म्हणूनच अशा लोकाची नियुक्ती होत आहे. आता त्यांनी सांगितलं की ते निवडून आलेत, पण त्याची पद्धत काय आहे? ते देखील आपल्याला लक्षात घेता येईल. ते कसे निवडून आलेत त्यांना कोणी मत दिली आहेत? हे देखील आपल्या लक्षात येईल आणि त्यांचा का राष्ट्रवादीशी संबंध आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे मला असं वाटतं, की दाऊदशी संबंधित लोकाच्या संदर्भात या सरकारला विशेष प्रेम दिसतय, म्हणून त्याचा देखील पर्दाफाश आम्ही आज केला.” असंही फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

  • याचा अर्थ स्वत:वरील आरोपांवर स्वत:च चौकशी करण्यासारखं आहे – आशिष शेलार

तर या अगोदर माध्यमांशी बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली, “ आज सभागृहामध्ये आमच्या प्रस्तावावर उत्तर देताना गृहमंत्र्यांकडून आमची अपेक्षा होती. ज्या पद्धतीचं एक महाभयंकर असं नाट्य त्या १२५ तासांच्या वरच्या व्हिडिओ सीडीमधून संपूर्ण देशाने पाहीलं, की विशेष सरकारी वकील विरोधकांमधील आमदारांना आणि नेत्यांना बरबाद करण्यासाठी आणि खोट्या केसेसमध्ये फसवण्यासाठी ज्या पद्धतीने पुरावे निर्माण करतो. त्या अॅड. चव्हाण यांच्या प्रकरणात राज्यातील पोलिसांचा उल्लेख आहे. काही वाक्य तर न्यायालयावर देखील आहेत. काही ठिकाणी शस्त्राचा उपयोग आहे. या सगळ्या गोष्टी समोर दिल्यावर पुन्हा एकदा गृहमंत्र्यांनी ती चौकशी राज्य सरकारच्या अंतर्गतच पोलिसांकडे सोपवली, सीआयडीकडे दिली. याचा अर्थ स्वत:वरील आरोपांवर स्वत:च चौकशी करण्यासारखं आहे. त्यावर आमचा भरवसा नाही. आम्ही सीबीआय चौकशीची मागणी केली. राज्य सरकारने सीबीआय चौकशी फेटाळणे याचा अर्थ या १३० तासांच्या महाभयंकर नाट्यामध्ये जे कोणी वरून खालपर्यंत सहभागी आहेत, त्यांना संरक्षण देण्यासारखं आहे. त्याचा आम्ही निषेध केला. ” असं शेलार यांनी माध्यमांना सांगितले.

  • या तिन्ही गोष्टी न झाल्याने आम्ही उद्धव ठाकरे सरकारचाधिक्कार करून सभात्याग केला…

याचबरोबर, “ आमची अपेक्षा होती, की आज अर्थसंकल्पीय सर्वसाधरण चर्चेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक भयंकर या राज्यातलं गुन्हेगारीकरण, दहशतवादीकरण कसं सुरू आहे, याचा पुन्हा एक पेनड्राईव्ह देऊन पुरावा दिला. ज्यामध्ये मंत्री नवाब मलिक यांच्या जवळ आणि वक्फ बोर्डात काम करणाऱ्या काही लोकानी अरशद खान आणि डॉ. लांबे यांचं संभाषण सांगतय, अतिशय आनंदात सांगतय की आमचे संबंध दाऊदशी कसे आहेत. दाऊदच्या बहिणीशी कसे आहेत. आमचे भाग कुठले आहेत, आमच्यातील प्रकरण दाऊकडे कशी जातात. आमच्या लग्नात दाऊत गँगची लोक कशी येतात. या सगळ्या गोष्टी सांगणारे त्याच्याशी संबंध ठेवणारे ज्यांच्यावर बलात्काराचे देखील आरोप आहेत, असे लोक सरकार नियुक्त असतात. आता दाऊदचे हस्तक मंत्रीपद आणि बरोबरीने विविध नियुक्त्यांवर देखील राज्यात यायला लागलेत की काय? त्यामुळे या विषयात देखील. तातडीने डॉ. लांबे आणि बाकी सगळ्यांचं निलंबन होईल आणि नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला जाईल, ही आमची अपेक्षा होती. या तिन्ही गोष्टी न झाल्याने आम्ही उद्धव ठाकरे सरकारचा, महाविकास आघाडीचा धिक्कार करून सभात्याग केला. ” असं म्हणत आशिष शेलार यांनी भाजपाच्या सभात्यागाचं कारण सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button