शिवसेनेत दरी निर्माण होणार नाही, सर्व आमदार पुन्हा मुंबईत येतील: संजय राऊत
मुंबई : शिवसेनेचे नाराज आमदार हे पक्षाचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना फुटणार नसल्याचा दावा केला आहे. ‘शिवसेना ही निष्ठावान सैनिकांची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपासणाऱ्यांची औलाद नाही. त्यामुळे शिवसेनेत दरी निर्माण होणार नाही. जे शिवसेनेतून बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहात असाल,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
आमदारांच्या फुटीबाबत बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला दुबळं करण्याचा प्रयत्न आहे, त्यामुळे ही फाटाफूट केली जात आहे का? हे फार मोठं कारस्थान आहे. शिवसेनेमध्ये आईचं दूध विकणारी औलाद तयार होणार नाही, हे वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, तेही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.
‘ते आमदार वर्षा बंगल्यावर’
‘माध्यमांमध्ये ज्या आमदारांची नावे शिवसेनेतून फुटले म्हणून चालवली जात आहेत, त्यातील बरेच आमदार आत्ता वर्षा बंगल्यावर आहेत. त्यांची नावे चुकीच्या पद्धतीने चालवली जात आहेत. गुजरातमध्ये नेण्यात आलेल्या आमदारांची व्यवस्था तिथल्या भाजप नेत्यांनी केली आहे. आम्हाला कुठे नेलं जात आहे, याची कल्पना नव्हती, असं या आमदारांनी आता सांगितलं आहे,’ अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली आहे.