महाराष्ट्रातही तणावाचे वातावरण निर्माण करण्याचं षडयंत्र रचलं होतं, संजय राऊतांचा आरोप
मुंबई |हनुमान जयंतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवेळी दोन समुदायांत हिंसाचार उसळल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातही असाच प्रकार घडवण्याचे षडयंत्र होते, असा आरोप त्यांनी केला आहे.
काल दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर हल्ला करण्यात आला. आतापर्यंत रामनवमी आणि हनुमान जयंती या उत्सवादरम्यान कधीही तणावाचे वातावरण नव्हते. पण यावेळी देशातील काही शक्तींनी ठरवून हे हल्ले घडवून आणण्यासाठी फार मोठे षडयंत्र रचले होते. महाराष्ट्रातसुद्धा हनुमान चालिसा आणि भोंग्यांच्या निमित्ताने तणावाचे आणि दंगेसदृश्य वातावरण करण्याचे षडयंत्र रचले होते. पण महाराष्ट्राचे पोलीस आणि जनता यांनी हे वातावरण उधळून लावले आहे. यापुढे सुद्धा राज्याची जनता कोणत्याही प्रकारचे षडयंत्र कोणी रचत असेल तर ते उधळून लावेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.
रामनवमी आणि हनुमान जयंती हे शांततेणे साजरे करण्याचे दिवस आहेत. कारण या दैवतांकडून समाजाला काही प्रेरणा आणि संदेश मिळालेला आहे. पण काही लोक या दोन्ही दैवतांचा उपयोग राजकीय कारणांसाठी करत आहेत. त्यांनी हे करु नये. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अखंडतेला आणि एकतेला धार्मिक द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातल्या ओवेसी कोण आहेत हे हजार भोंग्यावरून स्पष्ट झाले आहेत. या विषयावर ती सरकार सोबत चर्चा होऊ शकत होती. सुप्रीम कोर्टाचे काही निकाल आहेत त्याच्या वरती काही कार्यवाही सुरू आहेत असं असताना फक्त या राज्यांमध्ये अशांतता आणि अस्थिरता निर्माण करून भारतीय जनता पक्षाच्या मनातली राष्ट्रपती राजवट निर्माण करणारी स्थिती निर्माण करणे यासाठी हे भुंग्याचा राजकारण झालं होतं पण काल कोल्हापूरचं झालेलं मतदान आणि लोकांनी ठेवलेला संयम यामुळे हे वातावरण बदललं आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.