breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“…तर मुख्यमंत्री पश्चिम बंगालसारखा निर्णय घेतील”; वाढत्या रुग्णसंख्येवरुन विजय वडेट्टीवार यांचा इशारा

मुंबई |

राज्यात रुग्ण वाढले तर पश्चिम बंगालसारखा निर्णय घ्यावा लागेल. तसेच पश्चिम बंगालप्रमाणे निर्बंध महाराष्ट्रात लागू शकतात असा इशारा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. शाळा, कॉलेज आणि लोकलसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील असेही वडेट्टीवार म्हणाले. सुरुवातीला कंटेन्मेंट झोनमध्ये निर्बंध लागण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंदर्भात चर्चा होणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. “१५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण हे विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी आनंदाची बाब आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेने प्रवेश केला आहे. महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढत आहे. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे,” अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी टीव्ही९ सोबत बोलताना दिली.

“पश्चिम बंगालमध्ये शाळांसह काही गोष्टी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशीच स्थिती महाराष्ट्रात येत आहे. पश्चिम बंगालने जसा लवकरात लवकर निर्णय घेतला तसा निर्णय मुख्यमंत्री देखील घेण्याची शक्यता आहे. त्याबाबत चर्चा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मुलांचे लसीकरण करणे अत्यंत आवश्यक होते. १५ ते १८ वयोगटातील मुलांचे झाल्यानंतर त्याखालील मुलांचे लसीकरण आपल्याला करता येणार आहे,” असे वडेट्टीवार यांनी म्हटले. मुलांच्या लसीकरणामध्ये केंद्रावर कुठेही साठा कमी पडणार नाही. कारण एकाच दिवशी सर्व लसीकरण होणार नाही. त्यामुळे ज्या पद्धतीने नियोजन केले आहे त्यानुसार लसींचा साठा कमी पडणार नाही, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

“काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन तयार करुन त्याच्या बाहेर लोकांना जाता येणार नाही हा एक पर्याय असणार नाही. गर्दी कुठेही होणार नाही याची दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे. रेल्वे आणि शाळांबाबत निर्णय लॉकडाऊनमध्ये होणार आहेत. रेल्वेमध्ये होत असलेल्या गर्दीबाबत मुख्यमंत्री गंभीर आहेत पण तो निर्णय कधी घ्यायचा हे टास्कफोर्ससोबत चर्चा करुन निर्णय होईल,” असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले असून सोमवारपासून सर्व शिक्षण संस्था बंद ठेवल्या जाणार आहेत. सर्व कार्यालये ५० टक्के उपस्थितीसह सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये रात्री १० वाजल्यापासून पहाटे ५ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button