पंढरीतील विठ्ठल मंदिर ५ वर्षात दिसणार संतांच्या काळातील ७०० वर्षांपूर्वीचे मंदिर
पंढरपूर – जगभरातील लाखो विठ्ठल भक्तांचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूरचे विठ्ठल रखुमाई मंदिर आता पुढील पाच संतांच्या काळातील म्हणजेच ७०० वर्षापूर्वीच्या पुरातन मंदिरासारखे दिसणार आहे. कारण आता या मंदिराच्या विकास आराखड्याला मंदिर समितीने मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे.
हे विठ्ठल मंदिर हे ११ व्या शतकातील असल्याचे अभ्याकांचे मत आहे. त्याच्याही आधीपासून म्हणजे ७०० वर्षांपासून हे मंदिर पंढरपुरात अस्तित्वात असल्याचे अन्य काही अभ्यासकांचे मत आहे. आता या मंदिराला त्या काळातील रूप देण्यासाठी हा पुरातत्व विभगाने दोन वर्षे मेहनत करून तयार केला आहे.हा आराखडा पूर्णपणे तयार असून यासाठी ६१ कोटी ५० लाख रुपये खर्च येणार आहे. हा आराखडा मंदिर समितीकडे सोपविल्यानंतर मंदिर समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली आहे.
आता हा अंतिम आराखडा मंजुरीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठविला आहे.त्यानुसार मंदिराचे काम पाच टप्प्यात होणार असून पहिल्या टप्प्यात त्याला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी दगडांची झीज झालेल्या ठिकाणी रासायनिक संवर्धन केले जाईल.तर दुसऱ्या टप्प्यात विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून दगडी बांधकाम केले जाणार आहे. तिसऱ्या टप्प्यात नामदेव महाद्वार पाडून पुरातन दगडाचे महाद्वार बनविले जाणार आहे. तसेच मंदिरावरून जाणारी दर्शन रांग काढून मंदिराशेजारी एक स्कायवॉक बनविला जाणार आहे.अखेरच्या टप्प्यात अग्निशमन यंत्रणा, वायरिंग व वातानुकूलित यंत्रणेचे काम केले जाणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.