यंत्रणेचा गैरवापर होतोय, मलिकांच्या ईडी चौकशीप्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया
मुंबई | प्रतिनिधी
नवाब मलिक यांच्या ईडी चौकशीप्रकरणी यंत्रणेचा गैरवापर केला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. ते म्हणाले की, ‘आम्हाला खात्री होती की आज ना उद्या हे घडेल. कारण नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात, त्यामुळे काहीतरी प्रकरण काढून त्यांना असा त्रास दिला जात आहे. त्यामुळे याबद्दल जास्त भाष्य करण्याची गरज नाही.’ आज सकाळपासूनच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची ईडी चौकशी सुरू आहे.
आज पहाटे पाच वाजता ईडीचे अधिकारी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं आहे. तसेच, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँण्ड्रिंग प्रकरणी नवाब मलिकांची चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, “काही झालं तर आणि विशेषकरुन मुस्लीम कार्यकर्ता असला तर दाऊदचं नाव घेतलं जातं. मी राज्याचा मुख्यमंत्री असतानाही असा आरोप झाला होता. त्यावेळीही असंच वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. त्याला आता २५ वर्ष झाली. पुन्हा तशीच नावं घेऊन लोकांना बदनाम करणं, लोकांना त्रास देणं, सत्तेचा गैरवापर करण्याचं काम सुरु आहे. जे लोक केंद्र सरकारविरोधात तसंच विरोधात वापरल्या जाणाऱ्या तपास यंत्रणांविरोधात जे भूमिका मांडतात त्यांना हा त्रास देण्याचा प्रयत्न असून तेच घडलं आहे,” असंही शरद पवार म्हणाले.