“तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही”; खासदार संजय राऊतांचे चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर
मुंबई |
राज्याच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला बुधवारपासून सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या मुद्द्यांवरुनही विरोधकांनी टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी मानेच्या त्रासामुळे उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र, यावरून आता भाजपाने मुख्यमंत्री अधिवेशनाला उपस्थित राहणार का असा सवाल केला आहे. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
“मुख्यमंत्र्यांचे दर्शन काही दिवस होऊ शकले नाही. काही अडचणी असतात. पंतप्रधान उत्तर प्रदेशच्या प्रचारामध्ये दंग आहेत. देशाचे गृहमंत्री सुद्धा महाराष्ट्रात दंग आहेत. निदान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तरी शासकीय कामे करत आहेत. विरोधकांनी काल तर चहापाणावर बहिष्कार टाकला होता. महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ सक्षम आहे आणि गरज असेल तर मुख्यमंत्री विधान भवनात येतील,” असे संजय राऊत म्हणाले.
चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंच्या अनुपस्थित आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याचा सल्ला दिल्यानंतर संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. “तुमच्या सल्ल्याची गरज नाही आणि तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत आणि मंत्रीमंडळ उत्तम काम करत आहे चंद्रकांत पाटील यांना माहित आहे. सल्ले कशाला देताय. विरोधीपक्षाचे काम चोखपणे करा,” अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
- काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
उपचार काळात राज्यानं मुख्यमंत्र्यांना पाहिलं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. “४५ दिवस राज्याच्या जनतेने राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेलं नाही. आमचं म्हणणं आहे की तुम्ही बरे व्हा ना. तुमची प्रकृती ठीक नसेल तर चार्ज द्या. एक दिवस विदेशात जायचं असेल, तर चार्ज द्यावा लागतो. पण तुमचा कुणावर भरवसाच नाहीये. चला चार्ज तुम्ही ज्याच्यावर विश्वास आहे अशा आदित्य ठाकरेंकडे द्या. कुणीतरी माणूस हवा ना”, असं पाटील म्हणाले.