मान्सूनचा परतीचा प्रवास आजपासून सुरु – IMD
आजपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मान्सूनचा हा परतीचा प्रवास पश्चिम राजस्थान, संलग्न गुजरातच्या काही भागातून सुरु झाला आहे. पुढील २४ तास मान्सुन परतीसाठी गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश अशा काही भागात अनुकुल वातावरण असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
दरम्यान पाच आक्टोबरपासून पुढचे 4 ते 5 दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली होती. यानुसार राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. मान्सुनच्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाल्यानंतर, वातावरणातील आर्द्रता हळुहळू कमी झाली की, त्यानंतर हा प्रवास पुढच्या टप्प्यातून संपण्यासाठी वेळ लागत नाही. यामुळे १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस देशभरातून माघार घेतो. त्यानुसार या वर्षीही पावसाचा वायव्येतून सुरू झालेला प्रवास वेळेतच संपण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईशान्य अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम दिशेकडे सरकल्यानंतर, वायव्य भारतात पश्चिम आणि नैऋत्य दिशेकडून येणारे वारे हवेच्या खालच्या थरात निर्माण होण्याचा अंदाजही वर्चवण्याच येत आहे.
यंदा सप्टेंबरमध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि अखेरच्या आठवड्यातील चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास लांबला आहे. हा प्रवास वायव्य भारतामधून ६ ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. सर्वसाधारणपणे हा प्रवास १७ सप्टेंबरला सुरू होतो. परतीच्या पावसाचा हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक रेंगाळलेला प्रवास आहे.