राज्यात नव्या बाधितांचा आकडा कमी पण मृतांचा आकडा वाढला
मुंबई – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्राला देखील बसला आहे. मात्र, आता राज्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्यामुळे दुसरी लाट ओसरत असल्याचं चित्र राज्यात दिसू लागलं आहे. राज्य सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांमध्ये राज्यात ७ हजार २४३ नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. हा आकडा सोमवारी ७ हजार ६०३ इतका होता. त्यामुळे नव्याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागल्याचं दिसून येत आहे.
राज्यातल्या आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या जास्त दिसत असली, तरी त्यातले आजघडीला फक्त १ लाख ४ हजार ४०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच, ५९ लाख ३८ हजार ७३४ कोरोनाबाधित करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत. गेल्या २४ तासांत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचा आकडा १० हजार ९७८ अर्थात इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आज ९६.२१ टक्के इतका झाला आहे.
दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १९६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी हा आकडा फक्त ५३ इतका नोंदवण्यात आला होता. मात्र, त्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आजच्या आकडेवारीनंतर राज्यात कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा १ लाख २६ हजार २२० इतका झाला आहे.