मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा पारा सलग दोन दिवस घसरत चाललाय
मुंबई | सध्या राज्यातील तापमानाचा पारा उतरत चालला आहे. त्यामुळे थंडीने जोर धरला आहे. आता मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येचा पाराही घसरत चालल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवस सतत चढता आलेख नोंदवत मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या २० हजारपार पोहोचली. मात्र हा चढता आलेख सलग दुसऱ्या दिवशी खाली आला आहे. काल तर राज्याची रुग्णसंख्या ४४ हजार ३८८ इतकी नोंदवली गेली असताना मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या मात्र १ हजाराने कमी होत १९ हजार ४७४ इतकी नोंदवली गेली.
राज्यात कोरानाचा संसर्ग झपाट्याने होत असताना मुंबई आणि पुणे जिह्यातील आकडेवारी ही सर्वाधिक होती. मुंबईत २० हजार ९७१ रुग्णसंख्येपर्यंत कोरोनाची मजल गेली होती. मात्र त्यानंतर शनिवारी २० हजार ३१८ आणि काल रविवारी १९ हजार ४७४ रुग्णांची नोंद झाली. तर ७ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सलग दुसऱ्या दिवशी हा आलेख खाली आल्याने कोरोनापासून मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच राज्य सरकारचे कठोर निर्बंधही आजपासूनच लागू होत आहेत. त्यामुळे गर्दी कमी होऊन हा रुग्णांचा आकडा आणखी कमी होईल. तसेच मुंबईतील कोरोना केंद्रे आणि रुग्णालयांतील ८० टक्के बेड आजही रिकामेच आहेत. याचा अर्थ रुग्ण घरच्या घरी उपचाराने बरे होत आहेत. ३४ हजार ९६० बेडपैकी आतापर्यंत ७ हजार ४३२ बेड म्हणजे २१ टक्के बेडवर रुग्ण आहेत. त्याचप्रमाणे काल एकाच दिवसात ८ हजार ६३ रुग्ण बरेही झाले.