कोंढव्यातील ‘तो’ खून अनैतिक संबंधाच्या संशयातून
पुणे | कोंढवा येथे झालेला खून अनैतिक संबंधाच्या संशयतून करण्यात आल्याचे समोर आले आहे. चार ते पाच जणांच्या टोळक्याने रिक्षा चालकासह दोघांना जबर मारहाण केली होती. यामध्ये एका व्यक्तीचा खून झाला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.रवी कचरू नागदिवे (वय 50) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर त्याचा मित्र रिक्षाचालक बालाजी चव्हाण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी अधिक माहिती अशी की, मयत रवी नागदिवे हा उरुळी देवाची येथील एका शाळेत सुरक्षा रक्षक म्हणून काम करीत होता. तर त्याचा मित्र बालाजी चव्हाण हा रिक्षाचालक आहे. येवलेवाडी तील डोंगराजवळ असलेल्या एका प्लॉटवरील खोलीत रवी नागदिवे याची त्रेपन्न वर्षाची मैत्रीण राहत होती. तिला भेटण्यासाठी रवी हा बालाजीसह त्या ठिकाणी गेला होता.
दरम्यान त्या ठिकाणी प्लॉटिंगशी संबंधित असणाऱ्या सुपरवायझर आणि इतरांना रवी आणि संबंधित महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आला. तसेच तिथे असलेल्या खोलीचा वापर ते करत असावेत, असा त्यांचा समज झाला. याच कारणावरून चार ते पाच जणांच्या टोळक्याने त्यांना बांबूने आणि लाथा-बुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही जखमी अवस्थेत तिथे एका खोलीत डांबून ठेवले होते.
त्यानंतर आरोपींनी काही वेळाने बालाजीच्या रिक्षात दोघांना कोंबले आणि उंड्री येथील एका रस्त्यावर सोडून पलायन केले. जखमी अवस्थेत असणाऱ्या त्या दोघांना नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी रवी नागदिवे याला मयत घोषित केले. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.