“सत्ताधारी शिवसेनेची मराठी आस्मिता व त्याविषयी प्रेम किती पोकळ,” भाजपा आमदाराचा संताप
मुंबई |
जो मुंबईकर मराठी माणूस संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लढला तोच आज मुंबईतून हद्दपार झाला व आता लोकलचे धक्के खात मुंबईत दररोज ये-जा करतो आहे. या मराठी माणसाच्या आस्मितेचा वापर करत सत्ताधारी शिवसनेने या शहरावर ३० वर्षे सत्ता अक्षरश: भोगली, पण आता सत्ताधारी शिवसेनेला या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या हुतात्मा स्मारकाचाच विसर पडला आहे! यापेक्षा लाजिरवाणी बाब काय असू शकते? अशी टीका आमदार अमित साटम यांनी केली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी या मुद्द्याकडे जातीने लक्ष घातले पाहिजे असेही ते म्हणाले.
“संयुक्त महाराष्ट्र चळवळतील वीरांच्या स्मरणार्थ ‘हुतात्मा चौक’ उभारण्यात आला. आता या घटनेला नुकतेच ६० वर्ष पुर्ण झाले. या ठिकाणाला ‘हुतात्मा चौक’ न म्हणता त्यास सन्मान देऊन ‘हुतात्मा स्मारक’ संबोधले पाहिजे. म्हणून त्याचे नामकरण करण्याचा प्रस्ताव महापालिकेने २०१७ साली स्वीकारला होता. हा प्रस्ताव सभागृहात मंजूर करून आयुक्तांच्या अभिप्रायासाठी पाठविण्यातही आला. आज घटनेला तब्बल ४ वर्षे ६ महिने पुर्ण झालेत परंतु कोणतीही हालचाल झाली नाही. यावरूनच सत्ताधारी शिवसेनेची मराठी आस्मिता व त्याविषयी प्रेम किती पोकळ आहे, हेच सिद्ध होते. ज्या तत्परतेने काळ्या यादीतील कंत्राटदारांना बाहेर काढून परत मुंबईकरांचा पैसा लुटण्यासाठी मोकळ रान दिले. तीच तत्परता हुतात्मा स्मारकाच्या नामकरणासाठी का नाही?,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.