“वरच्यांच्या परवानगीशिवाय लखीमपूरची घटना शक्यच नाही”; भाजपा आशिष मिश्राला वाचवत आहे- असदुद्दीन ओवेसी
नवी दिल्ली |
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार घटनेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा लखीमपूर खेरी हिंसाचाराच्या घटनेत आशिष मिश्राला वाचवत आहे असे ओवेसी यांनी म्हटले आहे. तसेच वरच्या परवानगीशिवाय काहीही होऊ शकत नाही असे गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. लखीमपूर प्रकरणावरून ओवेसी यांनी पोलिसांच्या कारवाईवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “या प्रकरणाला घटना म्हणता येणार नाही. ही पूर्णपणे नियोजनासह केलेली हत्या आहे. भाजपा आणि आरएसएसमध्ये कोणतेही काम होते ते वरच्यांच्या परवानगीशिवाय होत नाही. पूर्णपणे नियोजनाद्वारे निष्पाप शीख शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्यात आले. ही आवेगपूर्ण प्रतिक्रिया नव्हती तर पूर्णपणे नियोजनाद्वारे हे कृत्य करण्यात आले,” असे ओवेसी यांनी आज तकसोबत बोलताना म्हटले आहे.
“केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणानंतर हा हिंसाचार झाला आहे आणि त्यानंतर खूप वेळानंतर मंत्र्यांच्या मुलाला अटक करण्यात आली. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाल्यानंतर पोलीस त्याला बोलवतात. तपासाच्या ११ तासांमध्ये १० वेळा नाष्टा दिला जातो. खूनाच्या आरोपीला तुम्ही १० वेळा खायला घालता? तो पोलिसांकडे नाही तर सासूरवाडीला गेला होता असे वाटत होते. मंत्र्यांनी सुद्धा कबुल केले आहे की ती आमची गाडी होती. भाजपा सरकार कोणाला मूर्ख बनवत आहे. नरेंद्र मोदी किंवा योगी आदित्यनाथ मिश्रा यांचा संबंध एका उच्च जातीसोबत असल्याने त्यांना वाचवत आहे. भाजपा पूर्णपणे त्यांना वाचवत आहे,” असे ओवेसी यांनी म्हटले आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना भरपाई देताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, “या लोकांना लाज वाटली पाहिजे. मानवी जीवनाची किंमत फक्त ४५,००,००० रुपये आहे का?”. उत्तर प्रदेश सरकारने आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करत हिंसाचारात मरण पावलेल्या चार शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना ४५ लाख रुपयांची भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारवर निशाणा साधत असदुद्दीन ओवैसी म्हणाले की, पंतप्रधानांनी अनेक आरोपांनंतर अजय कुमार मिश्रा यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजे. जर आरोपी मंत्र्याचा मुलगा असेल तर न्याय कसा मिळेल, असा सवालही त्यांनी केला. गेल्या रविवारी लखीमपूर खेरी जिल्ह्यात ही घटना घडली जेव्हा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि राज्यमंत्री (गृह) अजय मिश्रा तेनी शासकीय योजनांची पायाभरणी करण्यासाठी लखीमपूर खेरीला भेट देणार होते.