खेड-शिवापूर नाका बंद होणार नाही, केवळ त्याचे तात्पुरते हस्तांतर होणार
पुणे – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच सातारा-पुणे राष्ट्रीय मार्गावर यापुढे टोल घेतला जाणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र, याच रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाक्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोलनाका हा बंद होणार नसून या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत हा टोलनाका रिलायन्स इन्फ्राच्या ताब्यातून एनएचएआय म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण हे स्वतःच्या ताब्यात घेणार आहे. याचाच अर्थ असा आहे की, टोलनाका बंद होणार नाही तर या कालावधीत कंत्राटदाराला टोलचे पैसे मिळणार नाहीत. कारण टोलनाका केवळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरीत होणार आहे.
सुहास चिटणीस पुढे म्हणाले की, पुणे-सातारा रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोलनाका ‘एनएचएआय’च्या ताब्यात असणार आहे. तर, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा टोलनाका रिलायन्स इन्फ्राकडे देण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कामासाठी खर्च झालेली रक्कम रिलायन्स इन्फ्राकडून वसूल करण्यात येईल. त्यानुसार आता टोलनाका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.