breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत, ते गेल्यानंतर मला जे…”; प्राप्तिकर विभागाच्या छाप्यांनंतर उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

मुंबई |

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी, पार्थ पवार यांच्या मुंबईतील कार्यालयावर प्राप्तिकर विभागाकडून गुरुवारी छापे टाकण्यात आले. तसेच साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला. केवळ माझे नातेवाईक आहेत, म्हणून त्यांच्या संस्थांवर छापे टाकले असतील, तर कोणत्या स्तरावर जाऊन राजकारण केले जात आहे, वेगवेगळ्या संस्थांचा कसा वापर केला जात आहे, याचा आता जनतेनेच विचार करावा, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी दिली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी छापेमारीवर भाष्य केले आहे.

“पाहुणे वेगवेगळ्या घरात आहेत. त्यांचे काम चालू आहे. ते गेल्यानंतर मला जे बोलायचे होते ते बोलेन. आता ते घरी आणि वेगवेगळ्या ऑफिसमध्ये आहेत. ते जेव्हा जातील तेव्हा मला जी भूमिका मांडायची आहे ती मी मांडेन आणि जे नियमानुसार आहे ते जनतेच्या समोर येईल. त्यात घाबरण्यासारखे काही कारण नाही,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांवर छापे टाकले. प्राप्तिकर विभागाने इतर कंपन्यांवर छापे टाकले, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही, पण ज्यांचा काही संबंध नाही त्यांच्या संस्थांवर छापे टाकले, त्याचे वाईट वाटल्याचे पवार यांनी म्हटले. “माझ्याशी संबंधित सर्व कंपन्यांचे कर व्यवस्थितपणे वेळच्या वेळी भरले जातात. तरीही ही कारवाई राजकीय हेतूने केली की प्राप्तिकर विभागाला आणखी काही माहिती हवी होती, ते त्याबद्दल तेच सांगू शकतील. मात्र एका गोष्टीचे दु:ख आहे की, माझ्या बहिणी ज्यांची ४० वर्षांपूर्वी लग्ने झाली, त्या सुखाने संसार करतात, मुले-नातवंडे आहेत, त्यांच्या संस्थांवर छापे टाकले. त्यामागचे कारण समजू शकले नाही,” असे पवार यांनी गुरुवारी म्हटले होते.

  • अधिकारांचा अतिरेक- शरद पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तिकर विभागाकडून कारवाई करण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. “उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्यानंतर मी या प्रकाराची तुलना जालियानवाला बागेतील हत्याकांडाशी केली. त्या प्रतिक्रियेमुळे सत्ताधाऱ्यांना राग आल्याने त्यांनी अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर कारवाई केली असावी, असे त्यांनी नमूद केले. तपास यंत्रणांना चौकशी करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या निवासस्थानांवर छापे टाकणे, हा प्रकार म्हणजे अधिकारांचा अतिरेक आहे,” असे शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button