breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राधानगरी धरणाचा दरवाजा अडकला; पाण्याचा विसर्ग वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोल्हापूर |

कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे दरवाजे आज सकाळी नियमित तांत्रिक कामासाठी उघडण्यात आले होते. मात्र यापैकी एक दरवाजा काम सुरु असताना उघडून अडकला आहे. यामुळे भोगावती नदी पात्रात अचानक जास्त पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरवाजा उघडा राहिल्याने भोगावती नदीत अधिक पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या लोकांनी पाण्यात उतरण्याचे टाळावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

राधानगरी धरणाचा दरवाजा १८ फूटांवर अडकलेला आहे. त्यामुळे त्यातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होऊ लागला आहे. हा धोका दूर करण्यासाठी कोल्हापूरहून पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे. अद्याप (२९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी बारा वाजेपर्यंत) अधिकारी तेथे पोचले नाहीत. ते पोचल्यानंतर याबाबतची प्रक्रिया सुरू होईल. तोपर्यंत पाणी वाहत राहणार आहे. दरवाजा बंद होईपर्यंत धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात प्रवाहित होत राहणार आहे, असं संगण्यात आलंय.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी या विषयासंदर्भात घाबरुन जाण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. धरणाच्या दरवाजाची दुरुस्ती करण्यासाठी तज्ज्ञांची टीम घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय. जलसिंचन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी उपस्थित असून ते परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आलाय. या गावांमधील सतर्कतेचा इशारा देणारी यंत्रणा सुरु करण्यात आळीय. पाण्याची पातळी तीन ते चार फुटांनी वाढण्याची शक्यता जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय. तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी, “राधानगरी धरण गळती घटनेची जलसंपदा विभागाकडून चौकशी करण्यात येईल,” अशी पहिली प्रतिक्रिया दिलीय. याच पार्श्वभूमीवर नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदीवर जनावरं पाणी पाजण्यासाठी, धुणं धुण्यासाठी जाणं टाळावं असं प्रशासनाने सांगितलं आहे. राधानगरी ते कोल्हापूर पर्यंतच्या नदीकाठावरील सर्व गावांतील व्यक्तींनी सावध राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button