घराचे स्वप्न महागले! नदेशातील नऊ शहरामध्ये घरांच्या सरासरी किमतींमध्ये एप्रिल ते जून या काळात सरासरी पंधरा टक्क्यांनी वाढ
नवी दिल्लीः देशातील नऊ शहरामध्ये घरांच्या सरासरी किमतींमध्ये एप्रिल ते जून या काळात सरासरी पंधरा टक्क्यांनी वाढ झाली आहे. चेन्नईमध्ये ही वाढ सर्वाधिक पंधरा टक्के आहे, अशी माहिती ‘प्रॉपइक्विटी’ या माहिती विश्लेषण संस्थेने दिली आहे.
चेन्नईमध्ये घरांच्या किमती प्रतिचौरसफूट ६,७४४ रुपयांवर पोहोचल्या आहेत. वर्षभरापूर्वी या काळात घरांच्या किमती ५,८५५ रुपये प्रतिचौरसफूट इतक्या होत्या. गुरुग्राममध्ये घरांच्या किमतींमध्ये बारा टक्क्यांनी वाढ झाली आणि १०,३१५ रुपये प्रतिचौरसफूट दरांवरून प्रतिचौरसफूट ११,५१७ रुपयांवर या किमती गेल्या. हैदराबादमध्येदेखील बारा टक्क्यांनी घरांच्या किमती वाढल्या असून, त्या प्रतिचौरसफूट ६,४७२ रुपयांवर पोहोचल्या आहेत. नोएडामध्ये नऊ टक्के (७,४११ प्रतिचौरसफूट), बेंगळुरूमध्ये आठ टक्क्यांनी (६,१९६ रुपये प्रतिचौरसफूट) किमती वाढल्या आहेत. मुंबई, ठाणे आणि पुण्यामध्ये घरांच्या किमतींमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुंबईमध्ये घरांच्या किमती प्रतिचौरसफूट १८,२५९ रुपयांवर पोहोचल्या आहेत. ठाणे येथे प्रतिचौरसफूट ६,३२५ रुपये, तर पुण्यामध्ये प्रतिचौरसफूट ५,३४८ रुपये घरांच्या किमती गेल्या आहेत. कोलकाता येथे घरांच्या किमतींमध्ये सर्वांत कमी म्हणजे एक टक्का वाढ झाली आहे.
घरांच्या किमतींमध्ये गेल्या वर्षभरात अपेक्षित वाढ होत असल्याचे ‘प्रॉपइक्विटी’चे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक समीर जासुजा यांनी सांगितले. बांधकाम क्षेत्रात नऊ शहरांमध्ये प्रकल्पनोंदणी वर्षभरात एकूण ५१ टक्क्यांनी वाढ झाली; पण आधीच्या तिमाहीच्या तुलनेत त्यात २४ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले. ठाणे शहरांत घरांच्या विक्रीमध्ये वाढ होत असल्याचे निरीक्षण ‘कल्पतरू लिमिटेड’ संस्थेचे संचालक मुकेशसिंह यांनी सांगितले. पुणे शहरात घरांच्या विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाली असून, २१,९२७ घरांची (युनिट्स) विक्री झाली आहे. मुंबईमध्ये ९८ टक्क्यांनी विक्रीत वाढ झाली असून, ११,७३३ घरांची (युनिट्स) विक्री झाली आहे. इतर शहरांतही घरांच्या विक्रीमध्ये वाढ नोंदवली गेली.