एकात्मिक शहर विकासासाठी प्राधिकरण बरखास्तीचा निर्णय योग्य – राहुल कलाटे
पिंपरी – मूळ उद्देशापासून भरकटलेले पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. शहराचा एकात्मिक विकास साधण्यासाठी हा निर्णय चांगला असल्याचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी सांगितले.
या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कलाटे यांनी अभिनंदन केले आहे. या निर्णयाबाबत राहुल कलाटे म्हणाले, हा निर्णय सर्वसामान्य माणसांना दिलासा देणारा असून त्याचे राजकारण करण्याची गरज नाही.वर्षानुवर्षे अनधिकृत बांधकामांची टांगती तलवार आणि लीज होल्ड जागा फ्री होल्ड करण्यासाठीचे पहिले पाऊल आहे. हा चांगला निर्णय झाला आहे. याचा फायदा वाकड, थेरगाव, चिंचवड, काळेवाडी, रावेत, आकुर्डी, निगडी, चिखली, भोसरी आणि मोशी या गावांना होणार आहे.
गुंठा दोन गुंठे जागा घेऊन घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणा-या नागरिकांसाठी हा आनंददायी निर्णय आहे. विकसनाचे अधिकार महापालिकेकडे आल्याने राज्य शासन आणि महापालिका असा समन्वय साधून जनहीताचा निर्णय घेऊ शकतील.