शहर स्वच्छतेसाठी स्वयंपरीक्षण गरजेचे
नवी मुंबई | नवी मुंबई हे स्वच्छतेबाबत मोठय़ा क्षमता असणारे शहर असल्याने विविध स्तरांतून सर्वोत्तम गुणवत्तेची नेहमीच अपेक्षा केली जाते. त्यादृष्टीने आपण अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज असून स्वच्छतेच्या निकषांबाबत कोणताही निष्काळजीपणा चालणार नाही असे स्पष्ट करीत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ च्या परीक्षणाला सुरुवात होण्याच्या उंबरठय़ावर असताना अधिक काटेकोर राहून देशातील प्रथम क्रमांकाचे मानांकन संपादन करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज राहा, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.
स्वच्छ सर्वेक्षणाचे केंद्रीय स्तरावरून होणारे परीक्षण पूर्वसूचना न देता कधीही होणार असल्याने अधिकारी- कर्मचारी यांनी दक्ष राहण्याची गरज आहे, केंद्रीय परीक्षणापूर्वी स्वयंपरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. त्याकरिता स्वच्छ सर्वेक्षणामधील १४ मुद्दय़ांच्या अनुषंगाने तयार केलेल्या यादीनुसार कार्य होत असल्याबाबतची दैनंदिन तपासणी करावी व त्यामध्ये जाणवणाऱ्या त्रुटींबाबत तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना माहिती द्यावी व त्यामध्ये त्वरित सुधारणा करून घ्याव्यात अशा प्रकारचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले.
तसेच त्यांना यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत विभागीय पातळीवर प्रभावीपणे मोहीम राबवावी, असे आयुक्तांनी निर्देश दिले. शहरातील प्रत्येक दुकानाच्या बाहेर दुकानदाराने कचऱ्याचे डबे ठेवणे बंधनकारक असून तशा प्रकारची खात्री विभाग अधिकारी यांनी करून घ्यावी व या तपासणीसाठी विशेष पथक असावे, असे आदेश देण्यात आले आहेत. प्रभागात उभारण्यात येत असलेल्या विविध डिझाइनच्या आकर्षक कारंजांमध्ये मलप्रक्रिया केंद्रांतील प्रक्रियाकृत पाणीच वापरले जात असल्याची व तसे फलक कारंज्याच्या बाजूला प्रदर्शित केल्याची माहिती ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.