दीड महिन्यापासून बंद असलेला आंबेनळी घाट चार दिवसांत सुरू होणार
महाबळेश्वर – यंदाच्या जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे साधारण दीड महिन्यांपासून बंद पडलेली आंबेनळी घाटातील वाहतूक आता तीन–चार दिवसांत सुरू होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यासाठी कंबर कसली असून घाटातील रस्ता दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आता येत्या चार दिवसांत महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटातील रस्ता तुटला होता. अनेक ठिकाणी मोठ मोठ्या दरडी कोसळल्या होत्या. डोंगरातून वाहणारा पाण्याचा प्रवाह दरडींमुळे घाट रस्त्यावरूनच वाहत होता. त्यामुळे पूर्ण दरडींचा मलबा रस्त्यावर पसरला होता. मोठ मोठे दगडही रस्त्यावर आले होते. शिवाय काही ठिकाणी रस्ताही खचून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या संकटामुळे गेली दीड महिना ही घाट वाहतूक बंद आहे. ही वाहतूक सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाट रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. प्रतापगड परिसरातील ग्रामस्थांनीही घाट रस्ता तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली होती. लोकप्रतिनिधींनी भेटी देऊन पाहणी करुन संबंधित विभागाला सूचना दिल्या होत्या. मुसळधार पावसात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत हे काम सुरू करून केवळ दीड महिन्यात रस्ता दुरुस्तीचे काम पूर्णत्वाला आणले आहे. येत्या चार दिवसात या मार्गावरील वाहतूक पूर्ववत होणार आहे.