तळीये पुनर्वसन प्रकल्प : २६३ घरांच्या बांधकामासाठी नव्या वर्षांत निविदा
मुंबई |
रायगड जिल्ह्यातील महाड येथील दरडग्रस्त तळीये गावाच्या पुनर्वसनाचा रखडलेला प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. अखेर म्हाडाने ६०० चौ फुटांच्या २६३ घरांच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी सुरूत केली आहे. त्यानुसार जानेवारीच्या दुसऱ्या आठवडय़ात निविदा जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये तळीये गावातील कोंढाळकरवाडी येथे दरड कोसळली. या दुर्घटनेत ८० हून अधिक ग्रामस्थांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथील दरडग्रस्तांचे म्हाडाच्या माध्यमातून पुनर्वसन करण्याची घोषणा केली होती.
त्यानुसार म्हाडाचा कोकण मंडळ, मदत व पुनर्वसन विभाग आणि रायगड जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे पुनर्वसनाचा आराखडा तयार केला. या आराखडय़ानुसार प्रत्येक कुटुंबाचे ३००० चौ फुटांच्या जागेवर पुनर्वसन करण्यात येणार आहे. या जागेवर ६०० चौ फुटांचे प्री फॅब पध्दतीची घरे म्हाडाकडून बांधून देण्यात येणार आहेत. तर या पुनर्वसनात पाण्याची टाकी, शाळा, अंगणवाडी अन्य सुविधाही असणार आहेत. डिसेंबर अखेरीस घरांच्या बांधकामाला सुरुवात करण्याचे म्हाडाचे नियोजन होते. मात्र काही कारणामुळे त्यास विलंब झाला असून आता मात्र घराच्या बांधकामासाठी निविदा काढण्याची तयारी करण्यात येत आहे. पुढील दोन आठवडय़ात निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन महाजन यांनी याला दुजोरा दिला. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तातडीने घरांच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
- खर्च म्हाडा करणार…
तळीये पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत घरांच्या बांधकामासाठी, पुनर्वसनासाठी जागेची उपलब्धता, भूसंपादन रायगड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. तर घरांची बांधणी म्हाडा करणार असून यासाठी अंदाजे ५२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा निधी सरकारकडून उपलब्ध होण्याची शक्यता होती. पण आता मात्र हा खर्च म्हाडालाच करावा लागणार आहे. म्हाडा स्वत:च्या निधीतून ही घरे बांधून देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.