T20 WC: भारत-पाकिस्तान आमने-सामने; कोल्हापूर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त!
कोल्हापूर |
भारत-पाकिस्तान या संघांदरम्यान ट्वेंटी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील होणाऱ्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जागोजागी नाकाबंदी केली असून करोना नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय शनिवारी पोलिसांनी घेतला आहे. भारत-पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. पाकिस्तानवर विजय म्हणजेच स्पर्धेचे विजेतेपद मिळाल्याची भावना भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये असते. भारताचा विजय झाला की जोरदार जल्लोष देशभर साजरा केला जातो.
२०१९ मध्ये या स्पर्धेत भारताने सामना जिंकल्यानंतर कोल्हापुरातील शिवाजी महाराज पुतळा चौक तसेच इचलकरंजीतील मलाबादे चौक येथे जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला होता. गर्दीमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. हा संदर्भ देऊन कोल्हापूर पोलिसांनी वाहतूक कोंडी होऊ नये. जनमाणसावर याचा परिणाम होऊ नये, यासाठी उद्या कोल्हापूर, इचलकरंजीसह जिल्ह्यात चोख बंदोबस्त नेमण्यात आला आहे. अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. उघड्यावर अथवा चौकांमध्ये पडदा (स्क्रीन) लावू नये. चौकांमध्ये गर्दी करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व पोलीस ठाण्यांना आज दिले आहे.