स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळी स्मारक उभारणार : उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई । प्रतिनिधी
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यासाठी जगले, स्वराज्यासाठी हुतात्मा झाले. छत्रपती संभाजी महाराजांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा जागतिक दर्जाचा प्रेरणादायी भव्यदिव्य स्मारक वढु बुद्रुक येथे राज्य सरकारच्या वतीनं उभारण्यात येत आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. मुंबई येथील हिवाळी अधिवेशनात अजित पवार यांनी सभागृहात ही घोषणा केली.
अजित पवार म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे त्यांच्या कार्य-कतृत्वाला साजेसं असलं पाहिजे आणि त्यांच्या इतिहासाशी सार्धम्य सांगणारा हेरिटेज टच असला पाहिजे. स्थानिक ग्रामस्थ, इतिहास तज्ज्ञ व संबंधित व्यक्तींशी चर्चा करून स्मारकाचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.
जागतिक दर्जाचं स्वरूप प्राप्त होण्यासाठी स्मारक आराखड्याच्या बाबतीत स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. सदर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करून स्मारकाचं बांधकाम सुरु करण्यात येईल. समाधी स्थळाच्या ठिकाणी भौतिक सुविधा पुरवण्यासाठी १५० कोटींची तरतूद आहे.