“गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे”, खासदार संजय राऊत भाजपावर संतापले
मुंबई |
गोबेल्सला सुद्धा लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली आहे. राजकारणात आरोप होत असतात पण त्यासाठी काही मर्यादा पाळायला हव्यात. सरकारने यासाठी आता रणनीती आखण्याची गरज आहे असं मत संजय राऊत यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार भेटीवरही प्रतिक्रिया दिली आहे. तसंच विधानसभा अध्यक्ष निवडणूक आवाजी मतदानाने घेण्याचे संकेत दिले आहेत.
“मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीतून वेगळे अर्थ काढण्याची काही गरज नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमधील बैठक चांगली झाली. यावेळी रणनीतीवर चर्चा झाली असावी. विरोधी पक्षाकडून ज्या पद्धतीने हल्ले सुरु आहेत त्यातील अनेक हल्ले फुसके बार आहेत. पण एकत्रितपणे त्याचा प्रतिकार करणं गरजेचं आहे. जो भ्रम निर्माण केला जात आहे, आरोप केले जात आहेत त्यांना त्याच ताकदीने उत्तर देण्याची गरज मला वाटते. त्यासाठी मुंबईला गेल्यावर पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भेटून काय करायचं हे ठरवणार आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
- सरकारने रणनीती आखण्याची गरज
“एकतर्फी हल्ले होत असून चुकीचे आरोप केले जात आहेत. लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून प्रसारमाध्यमांचा वापर केला जात आहे. खोट्या आणि बनावट गोष्टीसुद्धा खऱ्या म्हणून समोर आणल्या जात आहेत. गोबेल्सलाही लाज वाटावी अशा प्रकारची यंत्रणा राबवली जात आहे,” अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. “राजकारणात आरोप होत असतात पण त्यासाठी काही मर्यादा पाळायला हव्यात. आणि त्यासाठी सरकारने रणनीती आखण्याची गरज आहे,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.